![](http://swarajyarashtra.com/wp-content/uploads/2022/06/IMG-20220619-WA0019-1024x764.jpg)
शिवबांच्या विचारांचे राज्य निर्माण करण्यासाठी माता जिजाऊ घडल्या पाहिजेत : सतीश काळे
– शेती व शेतकऱ्यांची दुरावस्था होण्याबरोबरच रोजगार, महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता शिवबांनी आखलेले धोरण पुन्हा राबविणे गरजेचे झाले आहे. शिवबांच्या विचारांचे राज्य निर्माण करण्यासाठी आताच्या काळात माता जिजाऊ घडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. थेरगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे सचिव मंगेश चव्हाण उपाध्यक्ष नितीन जाधव रविंद्र भोसले, विठ्ठल पाटील, गणेश सरकटे, बालाजी पवार, राजू तेलंगी, विशाल शेलार, महादेव वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सतीश काळे म्हणाले की, आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर जिजाऊ सारख्या माता निर्माण झाल्या पाहिजेत. जिजाऊंनी शिवबांना घडविले. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न दाखवून त्यावर मार्गक्रमण करायला लावले. त्यामुळेच शिवबांनी सर्व धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या हिताची स्वप्ने पाहिली. सध्याची देशाची परिस्थिती पाहता त्यामधून मार्ग काढायचा असेल जिजाऊंसारखा दृष्टीकोन आणि शिवबा सारखी रणनीती हवी, असे काळे म्हणाले.