हेमंत पाटील सातारा
सातारा – दिनांक १५ ऑक्टोंबर पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल ६० वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती ७-० सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी अर्चना किरण गुरव यांनी जवळपास पावणेतीनशे मतांनी विजय मिळवला आहे. तर घाणव ग्रामपंचायत पाटणकर गटाने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीत १-१ अशी बरोबरी झाली. परंतु सत्तांतरामुळे पाटणकर गटाला धक्का बसला आहे.
मोरगिरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वात तब्बल ६० वर्षे सत्तेत होती. अखेर या मोरगिरी विभागातील अत्यंत महत्वाची असणाऱ्या ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई यांच्या गटाने धक्का देत मोठे खिंडार पाडले. मोरगिरी ग्रामपंचायतीसाठी १ हजार २५८ मतदारांपैकी ९८५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होती. घाणव येथे ५३२ मतदारापैकी ३६५ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.