Friday, July 26, 2024
Homeइतरभारतीय राज्यघटनेने राष्ट्राला एकसंध ठेवण्याचे काम केले - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ...

भारतीय राज्यघटनेने राष्ट्राला एकसंध ठेवण्याचे काम केले – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड

पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

औरंगाबाद – आज दक्षिण आशियातील अनेक देश राजकीय अस्थिरतेचे संकटे पेलत असतांना भारत मात्र आजही भक्कमपणे स्थिर आहे. त्याचे एकमेव कारण भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेने येथील सर्व जाती व धर्माला एकसंध ठेवण्याचे काम केले. असे मत भारताचे अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केले. ते पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय औरंगाबाद आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय लोकशाहीचे ७५वर्षे : अनुभव व आव्हाने’ या विषयावर आधारित मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे २५ व २६ एप्रिल 2022 रोजी होणा-या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

पुढे बोलतांना डॉ. कराड म्हणाले ‘येणारे पुढील २५ वर्षे हे भारताचे असेल व या काळाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अमृत काळ’ असे म्हणले आहे. या अमृत काळात भारताचा मानवी विकास निर्देशांक कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.’ यावेळी डॉ भागवत कराड यांनी महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या पुढील विकासासाठी खासदार निधीतून चार लाखाची मदतही जाहीर केली.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय परिषद उद्घाटन समारंभाचे अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ काळे. अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे, राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, सचिव डॉ. मनोहर पाटील, डॉ. प्रशांत अमृतकर, जि. प. सदस्या मा. पुष्पाताई काळे, संस्थेचे संचालक रोहित काळे, हरिश्चंद्र लघाणे, डॉ रविंद्र भणगे व डॉ पी डी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्र- प्राचार्य तथा परिषदेचे संयोजक सचीव डॉ पंडित नलावडे यांनी केले. द्वितीय सत्रात डॉ. शैलेंद्र देवळाणकर,डॉ. शुजा शाकीर ,डॉ.विठ्ठल दहिफळे, डॉ. माणिक सोनवणे,डॉ. लियाकत आयुब खान,डॉ. कैलास सोनवणे ,यांनी वैचारिक मांडणी केली. तृतीय सत्रात सूत्रसंचालन डॉ प्रज्ञा देशमुख व डॉ संतोष तांदळे यांनी केले. तर आभार डाॅ. मनोहर पाटील यांनी व्यक्त केले. या राष्ट्रीय परिषदेसाठी प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री, प्राचार्या डॉ मीना पाटील, उपप्राचार्य डॉ डॉ एस आर मंझा उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या परिषदेसाठी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय औरंगाबाद व कै. बाबुरावजी काळे महाविद्यालय अजिंठा येथील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहे.

भारतीय लोकशाहीला ७५ वर्ष पूर्ण होत असताना आजही आपल्या समोर अनेक आव्हाने आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली आजही अनेक लोक समाज विघातक कृती करून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ काढून देशाचे ऐक्य धोक्यात येईल असे वक्तव्य केले जात आहे. हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली.-रंगनाथ काळे,अध्यक्ष अजिंठा शिक्षण संस्था औरंगाबाद

ही परिषद पंढरीच्या वारीसारखी असून वर्षभरात आम्ही परिषदेचे तीन अंक काढतो आणि संमेलन भरवतो व विचारमंथन घडवून आणतो तसेच विलासराव देशमुख यांनी या परिषदेसाठी दिलेल्या दोन लाखाचा फंड आज सहा लाखांवर गेला आहे आपणाला तो दहा लाख करायचा आहे आणि यातूनच उत्कृष्ट शोधनिबंधाला विविध पारितोषिके दरवर्षी दिले जाते असे प्रतिपादन केले. यासाठी सर्व महाराष्ट्रातील अभ्यासक तळमळीने आणि वारक-याप्रमाणे काम करतात – डॉ प्रमोद पवार ,महाराष्ट्र राज्यशास्त्र लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!