कुलदीप मोहिते कराड
कराड – दिनांक १ डिसेंबर
शिक्षण हा सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू आहे परंतु शिक्षक भरती न झाल्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवरती अतिरिक्त ताण येतो आहे. ज्ञानदानाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आहे, ही परिस्थिती कोणत्या एका संस्थेची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे.भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात त्यामुळे सर्व शाळा कॉलेजमध्ये पुरेशी शिक्षक संख्या असणे गरजेचे आहे सध्याची शिक्षण व्यवस्था व शिक्षक भरती प्रक्रिया याबद्दल आपल्या मनोगतातून संस्थेचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी खंत व्यक्त केली.
वेणूताई चव्हाण कॉलेजमधील वाणिज्य विभागाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका वनिता भादुले यांच्या सेवानिवृत्ती व शुभेच्छा समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील यांनी, “शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असतो. तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असतो. मॅडमना अनेक हुशार व अभ्यासू विद्यार्थी घडवण्याचे भाग्य लाभले आहे. शिक्षकांनी हुशार व होतकरू विद्यार्थी घडवावे अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी प्राध्यापिका वनिता भादुले यांच्या सामाजिक बांधिलकी व शिक्षण क्षेत्रातील गौरवपूर्ण योगदानाबद्दल अभिनंदन केले.
![](http://swarajyarashtra.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_2022-12-03-10-38-35-09_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7-1024x613.jpg)
सत्कारमूर्ती प्रा. वनिता भादुले सत्काराला प्रत्युत्तर देताना , “माझे विद्यार्थी माझी संपत्ती व प्रेरणास्थान आहेत. माझ्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले हीच माझी मोठी संपत्ती आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कायम ऋणात राहीन. विद्यार्थ्यांमुळे मी माझं व्यक्तिमत्व सुंदर करू शकले. यशवंतराव चव्हाण यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या संस्थेत सेवा करण्याची संधी व प्रकाश पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी प्रीती प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते माझा सत्कार होणे हे मी माझे भाग्य समजते.”
महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव कार्यक्रमाचे प्रास्ताविकात, “भादुले मॅडम या विद्यार्थीप्रिय, प्रामाणिक शिक्षिका आहेत. एक उत्तम पत्नी, आई, शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पडली आहे, तसेच त्यांनी इतर कलागुण सुद्धा जोपासले आहेत.” याप्रसंगी प्रा. आर. एस. पाटील, प्रा. पी. एस. सादिगले, डॉ. श्रीमती एम.ए. शिंदे, एम. एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय , प्रा.एस. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे यांनी आभार व्यक्त केले.
या सत्कार समारंभास महाविद्यालयातील माजी प्राचार्य बी. एन. कालेकर, . अंकुश जगताप, हरी डावरे, प्रा. एस. व्ही. जोशी, आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नातेवाईक, मित्रमंडळी, माजी विद्यार्थी, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.