जेजुरीचा खंडोबा, खारावड्याचा म्हसोबा , ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आता नरेश्वर महाराज नक्की पावणार कुणाला …. रोडगा वाहीन तुला ग भवानी आई … सत्वर पाव ग मला … तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू पदाच्या माळा म्हणत सरपंच पदाच्या खुर्चीचा खेळ रंगात आला आहे
कोरेगाव भीमा – दिनांक १८ नोव्हेंबर
शिरूर तालुक्यातील एका सधन ग्राम पंचायतीची चर्चा मात्र चांगलीच रंगली असून येथील सरपंच पदासाठी होणारी खेचाखेची सर्व तालुक्याला परिचित आहे. येथे शपथ घेतली जाते ती एकनिष्ठ राहण्यासाठी , ही निष्ठा कोणाशी असते खुर्चीशी की , देवाशी की , मतदारांशी, विकासाशी ,निष्ठावान कार्यकर्त्यांशी की पद मिळवण्यासाठी वाट्टेल ते असा प्रश्न पडला असून खुर्चीसाठी खेळ चाले शपथांचा , चमत्कार पहावा देवादिकांचा हा खेळ मात्र जोरात रंगला असून या गावचे राजकारणच चांगलेच रंगात आले असून देव नक्की पावणार कुणाला ही चर्चा जोरात रंगली आहे.
ज्यांनी एकमेकांसाठी भावकीला व गावकीला वेठीस धरत निवडणुका लावल्या ,वाद विवाद करत जय पराजय घडवून आणला आणि तेच नेते कार्यकर्त्यांना भावकीला सोडून पदासाठी कसलाही मतभेद न ठेवता एकत्र येत देवाची शपथ घेत असल्याचे बोलले जात आहे.
![](http://swarajyarashtra.com/wp-content/uploads/2022/11/imgonline-com-ua-twotoone-sWsmGboJcUTv-1024x331.jpg)
राजकारणात कोणी कोणाचे नसते हे ग्रामस्थांना आता तरी कळेल का ?? सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणारे ,प्रसंगी नेत्यांसाठी नात्याचा,भावाचा व घराचा विचार न करणाऱ्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले आहे.
निवडून येण्यासाठी एकमेकांच्या विरोधात असणारे उमेदवार ,निवडून आल्यावर आपल्या पॅनल ची सत्ता आली की धूमधडाक्यात आनंद साजरा करतात आणि अगोदर एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेतात , मागील फोडाफोडीचे अनुभव पाहता तातडीने नरेश्र्वर महाराज मंदिरात जातात देवाच्या शपथा घेतात यावर पुन्हा कोणाच्या तरी डोक्यात येत आता जेजुरीचा खंडोबा साक्षीला घेऊ मग जेजुरीला जाऊन भांडार उचलतात शपथ घेतात ,तेच खारावड्याच्या म्हसोबाला,तेच ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराज यांना साक्षीला ठेऊन निवडून आलेल्या माझ्या पॅनल मधील लोकांना मतदान करेल, विरोधातील पॅनलच्या उमेदवाराला मतदान करणार नाही एकनिष्ठ राहील, विरोधात जाणार नाही, पॅनल ने ठरवलेल्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल करणार नाही, श्रेष्ठी म्हणतील तिथेच ठाम राहणार अशी शपथ घेतात. पण वेळेत राजीनामा न देणे, प्रसंगी बंडाळी करत पद खेचणे हे काही नवीन नाही.
खरा प्रश्न पडतो या शपथा घेण्याचे कारण काय ?? सत्ता आणि सरपंच पदाची खुर्ची हे मुख्य कारण आहे की गावचा सर्वांगीण व शास्वत विकास, कचरा प्रकल्प, सांडपाणी शुद्धीकरण, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, पर्यावरण संवर्धन, महिलांचे प्रश्न , युवक व युवती रोजगार वृद्धी, कौशल्य विकास कार्यक्रम यासाठी शपथ घेतात की डोळ्यासमोर दिसते ती फक्त खुर्ची,मला सरपंच,उपसरपंच व्हायचय मग त्यासाठी वाट्टेल ते ??
यात कुचंबणा आहे ती सर्वसामान्य नागरिकांची, त्यांच्या विश्वासाची आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षाची तसेच येथे घुसमट होते सर्वसामान्य कार्यकर्त्यांची.
ज्या उमेदवारासाठी रक्ताच्या नात्याला दुरावणारा, घरात सख्ख्या नात्यागोत्याला विसरत नेत्याचा प्रचार करणाऱ्या , रात्रंदिवस कष्ट करत त्यांना विजयाचा गुलाल दाखवतात, त्यांच्या पराजयात धाय मोकलून रडतात पण संधी येताच हीच नेते एकत्र येत बेरजेचे राजकारण करतात काय ? याला सरपंच करायचं आहे ? त्याला उपसरपंच करायचं आहे म्हणून तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू पदाच्या माळा म्हणत मनोमिलन करतात तेंव्हा एकाकी पडतो तो निष्ठावंत कार्यकर्ता, त्याचे घर आणि त्याचा प्रामाणिकपणा पण पदासाठी सर्व विसरून एक होणाऱ्या नेत्यांना त्याचे काही नसते इथे घुसमट होते ती निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांची, त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्यामागे उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी मतदारांची कारण ज्यांना विरोधात पाहून आपण यांच्यामागे उभे राहिलो तेच एकमेकांच्या गळ्यात पडत आहे सगळ काही आलबेल आहे दाखवत आहे पण हे पाहून पश्र्चाताप होण्याची वेळ येते तेंव्हा तरुणांनी व राजकारणाचे वेड असणाऱ्या सर्वांनी आता शहान व्हावं ,आपले शिक्षण,उद्योग व्यवसाय , शेती यात कष्ट करावे त्यात झोकून द्या व आयुष्याला सोनेरी झळाळी द्या असा सल्ला देण्याची वेळ आलीय कारण ज्याच्यासाठी तुम्ही लढणार आहात तो नेता निष्ठावान आहे का हे तपासावे , पदासाठी तत्वाला व सत्वाला मूठमाती देत बेरजेचे राजकारण करणाऱ्या या लोकांपासून लांब राहून आपल्या आयुष्याचा , घराचा खेळखंडोबा करण्यापेक्षा सावध व्हा …. लांब रहा. अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण –
सदस्यांना एक करणारे श्रेष्ठी मात्र एक होत देवाची शप्पथ घेत हाती बेल भंडारा घेणार का ??
ग्राम पंचायत सदस्यांना एक करणारे श्रेष्ठी हे पॅनल , गट, तट विसरून ,याची जिरव त्याची जिरव सोडून हे सुद्धा आता एकनिष्ठेचा बेल भंडारा हाती घेत एक होणार का हा प्रश्न पडत आहे. एकमेकांना टाळणारे सत्तेचा खेळ करणारे हे श्रेष्ठी एक होतील तरच या एकीला महत्त्व राहणार आहे.
निवडून आलेल्या नवख्या व राजकारणाचा गंध नसलेल्या सदस्यांना शप्पथ घ्यायला लावणारे श्रेष्ठी मात्र कुठेही देवाला शिवत नाही, हेच याला सरपंच करू त्याला नंतर करू ठरवतात आणि संबंधिताची जबाबदारी घेत ठरलेल्या वेळेत पदाचा राजीनामा घेत नाही ,की घेतला जात नाही हे मात्र कळत नाही , कोणी कोणाला सरपंच होऊ देत नाही आणि यांचा पुन्हा खेळ सुरू होतो शप्पथांचा मग आता वेळेत राजीनामा घेणार व सर्वांना पदाचा लाभ देण्यासाठी जेजुरीचा भंडारा, खारावड्याच्या म्हसोबाचा व ग्राम दैवत भैरवनाथ महाराज,श्री नरेश्वर महाराजांचा गुलाल हातात घेत सर्वांना समान न्याय देण्यासाठी गुलाल हातात घेणार का ही चर्चा रंगली आहे.
देवादिकांच्या शप्पथा घेतल्या गेल्या आहेत .उरलेल्या तीन वर्षात पदाची विभागणी होऊन दीड दीड वर्ष ठरले आहे त्या दीड वर्षात कोणत्या उमेदवाराला सरपंच ,उपसरपंच कोणत्या वेळी व किती कालावधीसाठी पद देणार हे मात्र अनिश्चित, दोन दिवस अगोदर नावे जाहीर करणार व त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचा पण मागील वेळेस सरपंच पद ठरवले एकाला आणि दिले दुसऱ्याला त्याच काय ? जे ठरवतात त्यावर तरी ठाम राहतील काय ? पदाची संधी दीलेल्याचा राजीनामा कोण घेणार हे अनिश्चित, तुमच्या पॅनल ची जबाबदारी तुमची आणि आमच्या पॅनल ची जबाबदारी आमची, ठरलेल्या मध्ये काहीच गडबड होणार नाही ही शास्वती नाही. म्हणून दोघांनी या शप्पथ विधीला उपस्थित असूनही शप्पथ घेतली नाही, आणि एकाने विचार पटले नाही म्हणून मीटिंग मधून निघून आला तर दुसरा त्यामागे निघून आला.