सुदैवाने जीवित हानी नाही पण वाहतूक कोंडी झाली
पुणे – सोलापूर महामार्गावर बोरीभडक (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत यवत पोलिसांची पत्र्याची पोलीस चौकी वादळात थेट महामार्गावर येऊन आदळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक कोंडी झाली आहे.(Pune Solapur Highway)
पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. रविवारी (ता. १९) सायंकाळी चार ,सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या उंच ठिकाणी यवत पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी यवत पोलीस ठाणे अंकित छोटी पत्र्याची चौकी उभारण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यात ही टपरी थेट महामार्गावर जाऊन आदळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली असून महामार्गावरील वाहतुक कोंडी मात्र झाली तसेच उरुळी कांचन येथील आठवडी बाजारात येणाऱ्या तसेच सलग सुट्ट्यांमुळे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना या वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागला यामुळे काहीवेळ नागरिक व वाहनचालकांची गैरसोय झाली.
यवत पोलिसांनी तातडीने धाव घेत सदर टपरी रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.