कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली)
समाजाच्या उन्नतीसाठी आधुनिक शिक्षण प्रणाली ही खूप महत्त्वाची असून त्यासाठी सध्या राबविले जात असणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पुढील भारताचे भवितव्य घडविणारे आहे असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी मत व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाघोली यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत संस्थात्मक विकास योजनेवर यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही विचारधारा संस्थाचालक प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांनी प्रथम समजावून घेतली पाहिजे त्यानंतर ती कृतीतून अन्यायावर भर दिला पाहिजे असे झाले तर विकसनशील राष्ट्राच्या यादीतून विकसित राष्ट्राच्या यादीमध्ये भारताचे स्थान निर्माण होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांनी, राष्ट्राची खरी संपत्ती प्राध्यापक शिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वर्ग तर घडतोच पण अप्रत्यक्षपणे समाजाचाही विकास होत असतो असा हा विकास राष्ट्र उद्धाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो अशा लोकांवरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याची मुख्य जबाबदारी आहे ती त्यांनी प्रमाणिकपणे राबविली तर नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी होण्यास मदत होईल.
बिदरमधील कर्नाटका कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ.राजमोहन परदेशी यांनी ‘नवीन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० साठी अंतर्गत गुणवत्ता हमी दृष्टिकोन, एम पुक्टोचे अध्यक्ष व माजी प्राचार्य डॉ. एस. पी. लवांडे यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ. किशोर देसर्डा इतर प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या राष्ट्रीय सेमिनारसाठी देशभरातील शंभरहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पाटील डी.एन. यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी मानले तर डॉ. मोनिका जैन यांनी सूत्रसंचालन केले.
राष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी डॉ. सुप्रिया पाटील ‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार गुणात्मक विश्लेषण’ प्रा. पियुष पहाडे यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि महाविद्यालय नामांकन’ या विषयावर मांडणी करणार आहेत तर सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या हस्ते राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, डॉ. किशोर देसर्डा, डॉ. जे.सी. मोरे, डॉ. एस. व्ही. गायकवाड, डॉ. बी. बी. लांडगे, डॉ. मनीषा बोरा, डॉ. रमेश गायकवाड, श्री. शशिकांत केसकर व इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी वर्ग या सर्वांनी केलेले आहे.