तुम्ही महाराजांच्या भूमिका केल्याचं सांगता, एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा. बघू मग काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का ?
‘अमोल कोल्हे तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे, हे सांगून दाखवा. तुम्ही व्हाय किल्ड गांधी यात नथुराम गोडसेची भूमिका केली होती. तुम्ही महाराजांच्या भूमिका केल्याचं सांगता, एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा. बघू मग काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का’, असं आव्हान अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलं आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. याचसोबत अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे, यामुळे शिरूरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगणार आहेआढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर घणाघाती टीका केली.
‘शिवाजी आढळराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान ठेवला जाईल. जुना-नवा असा कोणताही वाद केला जाणार नाही. आजची सभा अमोल नाही तर अनमोल आहे’, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.
‘शिरूर लोकसभा आपल्याला मिळावी म्हणून मी नेहमी प्रयत्न करायचो. २००९ साली विलास लांडे पडले, २०१४ साली तर मोदींची लाट होती, त्यावेळी ३ लाखांच्या फरकाने हा गडी निवडून आला. १५ वर्ष हा बाबा काय हलेना. मग २०१९ साली मी अमोल कोल्हेंना गाठलं, पण कोल्हे काय तयारच होत नव्हते. आता एखादा राजकीय नेता पडत नसेल तर तिथे कलाकाराला उभं केलं जातं. अमिताभ बच्चन, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा. या अभिनेत्यांप्रमाणे कोल्हेंना उभं केलं, ते खासदारही झाले, मात्र या बाबाने मतदारांशी संपर्क ठेवला नाही, सगळे नेते ही तक्रार करायला लागले. मलाही हे पटलं नाही,’ असं अजित पवार म्हणाले.
‘कोरोना काळात एक दिवस माझ्याकडे आले अन् म्हणाले मला काय हे झेपेना. आता मी राजीनामा देतो, समाजाचे हित एखादा नेते जेव्हा जोपासतो तेव्हा आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. आता शिवाजीराव आढळराव मोठे उद्योजक आहेत, मात्र त्यांनी जनतेसाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. या दोघांची तुलना केली तर लक्षात येतं की आढळराव सरस आहेत’, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.